Pages

Popular Posts

Saturday, July 20, 2013

आपल्या जीवनातील गुरुंचे महत्त्व जाणून गुरुपौर्णिमा साजरी करूया !

गुरुपौर्णिमा

 

         आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ! साधना करणार्‍यांचा वर्षातील महत्त्वाचा उत्सव. गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरेची जोपासना झालेली आहे. किंबहुना ही परंपरा म्हणजे भारतीय संस्कृतीचे भूषण आहे. ‘गुरूंची महती’ हेच त्यातील मर्म आहे.
         शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, कारण ते प्रारब्धानुसार असते. गुरूंचे लक्ष फक्त शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीकडे असते. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’’ गुरूंची महती वर्णन करायला शिष्याला शब्द अपुरे पडतात. गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात.
         तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात सिद्धता करत असतात. हिंदु संस्कृतीमध्ये गुरूंनी शिष्याकरवी करून घेतलेले कार्य अनेक उदाहरणांद्वारे वर्णन करता येते. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरु-शिष्य जोड्या आणि त्यांचे अद्वितीय कार्य आज जगाला परिचित आहे. या सगळ्या उदाहरणांमधून अधर्माच्या विरोधात लढण्याचा श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश सर्वत्र पोहोचतो. विद्यमान काळातील अधर्माचरणी राजकीय वातावरण लक्षात घेता गुरु-शिष्य नात्याची प्रचीती आणि त्यातून धर्माचरणी राज्यस्थापनेची मुहूर्तमेढ पहायला मिळावी, ही गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी अपेक्षा !

मुलांनो, आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व जाणा !

आपल्या जीवनातील गुरूंचे महत्व !

भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! : ‘विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमा या सणाच्या निमित्ताने आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व कसे आहे, हे समजून घेऊया.
 

१. गुरूंचे महत्त्व आणि ‘गुरु’ शब्दाचा अर्थ

         आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ‘शिक्षकदिन’ साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.
 

२. मनुष्याच्या जीवनातील तीन गुरु !

२ अ. आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु !
पालक
पालक
         बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात. तसेच चांगल्या सवयी लावतात, उदा.

१. सकाळी लवकर उठावे, भूमीला वंदन करावे, ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ हा श्लोक म्हणावा.

२. मोठ्यांना नमस्कार का आणि कसा करावा.

३. सायंकाळी ‘शुभंकरोती’ म्हणावे, दिवा लावावा; कारण दिवा हा अंधकार नष्ट करतो.

४. आपण आपल्या मित्रांना भेटल्यावर नमस्कार करावा; कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे
.
५. तसेच आपल्या घरी कोणी पाहुणे आले की, त्यांचे देवासमान स्वागत करावे.

         अशा सर्व गोष्टी आई-वडील आपल्याला सांगतात, म्हणजे आपले पहिले गुरु आई-वडील आहेत; म्हणून आपण त्यांचा आदर करायला हवा आणि प्रतिदिन त्यांना नमस्कार करायला हवा. आता सांगा, तुमच्यापैकी किती मुले आपल्या आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार करतात ? आज आपण निश्चय करूया, ‘आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार करणार.’ हीच त्यांच्याप्रतीची खरी कृतज्ञता आहे.
२ आ. आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, हेच आपले दुसरे गुरु :
शिक्षक
शिक्षक
         खरेतर आपण शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करून या दिवशी त्यांना भावपूर्ण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा. गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि शिष्य म्हणजे आपण असतो; म्हणून आपण शिक्षकदिन याच दिवशी साजरा करायला हवा.
         शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. ते इतिहास शिकवतात. त्यातून ते आपल्यातील राष्ट्राभिमान जागृत करतात. आपण आपल्यासाठी जगायचे नसते, तर राष्ट्रासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार आपल्याला देतात. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव इत्यादी क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी प्राणार्पण केले, त्याप्रमाणे आपण त्याग करायला हवा. ‘त्याग हा आपल्या जीवनाचा पाया आहे’, हे आपल्याला शिक्षक सांगतात. त्यागी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात. इतिहासातून आपले आदर्श ठरतात, उदा. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर हेच आपले खरे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण त्यागी असायला हवे.
२ इ. निरनिराळे विषय निःस्वार्थीपणे शिकवून आपल्याला प्रगतीपथावर नेणारे आपले शिक्षक ! : शिक्षक आपल्याला मराठी भाषा शिकवतात. त्यामधून ते आपल्यामध्ये मातृभाषेचा अभिमान जागृत करतात आणि रामायण, महाभारत, दासबोध अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याची आवडही निर्माण करतात. यातून ते आपल्याला आपल्या संतांची ओळख करून देतात आणि ‘त्यांच्यासारखे आपण घडावे’, यासाठी प्रयत्न करतात. तसेच ते आपल्याला समाजशास्त्र, अर्थशास्त्र यांसारखे विषयही शिकवतात. यातून आपण ज्या समाजात रहातो, त्या समाजाचे ऋण आपल्यावर असते, याची जाणीव शिक्षक आपल्याला करून देतात. अर्थशास्त्रातून योग्य मार्गाने (धर्माने) पैसा मिळवावा आणि अयोग्य मार्गाने (अधर्माने) पैसा मिळवू नये, हे शिकवतात. नाहीतर आज आपण पहातो आहोत की, सारा देश भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. हे सर्व आपण पालटावे, असेच शिक्षकांना वाटते.
२ ई. अशा महान शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! : तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आले असेल, ‘शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो.’ काही मुले शिक्षकांची चेष्टा करतात, हे पाप आहे. आपण या दिवशी त्यांची क्षमा मागून त्यांच्याप्रती आज कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
 

३. आध्यात्मिक गुरु

आध्यात्मिक गुरु
आध्यात्मिक गुरु
३ अ. आध्यात्मिक गुरूंनी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ  विषद  करणे : आतापर्यंत आपण या भौतिक जगासंदर्भात मार्गदर्शन करणारे गुरु पाहिले. आता आपण आध्यात्मिक गुरु कसे असतात, ते पाहूया. तिसरे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु ! प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरु येतात. जसे श्रीकृष्ण-अर्जुन, श्री रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, समर्थ रामदासस्वामी-शिवाजी महाराज अशी गुरु-शिष्य परंपरा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.
         आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात. आपल्याला अज्ञानामुळे असे वाटते की, मी एक व्यक्तीr आहे; पण खरे पहाता आपण व्यक्ती नसून आत्मा आहोत, म्हणजे देवच आपल्यात राहून प्रत्येक कृती करतो; पण अहंकाररूपी अज्ञानामुळे आपल्याला वाटते, ‘आपण प्रत्येक कृती करतो.’ समजा, आत्मा आपल्यापासून वेगळा केला, तर आपण काही करू शकू का ? तेव्हा देवच सर्व करतो. तो अन्न पचवतो, तोच रक्त बनवतो, याची तीव्र जाणीव गुरु आपल्याला करून देतात.
३ आ. आनंदी होण्याचा सोपा मार्ग, म्हणजे आपल्या हातून घडणार्‍या चुकांच्या मुळाशी असलेले दोष शोधून ते घालवण्यासाठी प्रयत्न करणे : अहंकारामुळे व्यक्ती स्वतःला देवापासून वेगळी समजते आणि जीवनात सतत दुःखी रहाते. तेव्हा आपल्या जीवनात जर आध्यात्मिक गुरु यायला हवेत, तर आपण आपल्या जीवनाला प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी. आपण कोणतेही काम हातात घेतले की, प्रथम कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच ती कृती चांगली व्हावी; म्हणून प्रार्थना करावी. आपल्यावर गुरूंची कृपा व्हावी; म्हणून प्रतिदिन आपल्या हातून घडणार्‍या चुकांची नोंद करावी आणि त्यामागील दोष शोधावा. यामुळे आपले दोष लवकर जातील आणि आपल्यात देवाचे गुण येतील अन् आपण आनंदी होऊ.
         आता आपण देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्याला समजलेली सर्र्व सूत्रे आमच्या कृतीत येऊ देत, अशी प्रार्थना करूया.’
VISIT BLOG &FWD TO YOUR FRIENDS
GO THROUGH THE I LAND POSTS
          
 ramajayam.rediffiland.com

ramajayamgomati.blogspot.com

No comments: